Satej Patil
Maharashtra Cabinet Minister of State

By Khamkya India

कोल्हापूर : राजकारणी काय करु शकतात? हे सध्या कोल्हापूरकर अनुभवत आहेत. नेत्यांनी मनात आणल्यास प्रशासकीय यश किती उच्च पातळीवरचे असू शकते हे कोल्हापुरातील कमी होणारा कोरोनाचा आकडा दर्शवत आहे. गेली तीन महिने जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडत, पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रशासनाला कमालीची गती दिली. सकाळी दहापासून रात्री उशीरापर्यंत प्रशासकीय मोट सांभाळत सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील कोरोनास्थिती नियंत्रणात आणल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया कोल्हापूरच्या जनतेत आहे.

प्रशासनाने गेल्या तीन महिन्यात केलेल्या कामाचे फळ म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने जून महिना दिलासादायक ठरला. गेल्या २० दिवसांत नवीन १२९ कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले. तर सुमारे ५४९ जणांनी कोरोनावर मात केली. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही ७३६ वर पोहोचल्याने सर्वसामान्यांचा ठोका चुकला होता. मात्र, रुग्णांसह कोल्हापूरकरांना दिलासा देण्याचे मोठे काम सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने केले. आतापर्यंत कोल्हापुरातून ६८४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आठजणांचा बळी गेला आहे. मुंबई, दिल्ली आणि शेजारील पुणे जिल्ह्यातील मृतांचा आकडा आणि तिथे असणाऱ्या वैद्यकीय सुविधा पाहता कोल्हापूरात कोराेनावर मात केल्याचे स्पष्ट होते.

कोरोना महामारीत गतीमान प्रशासन हे सतेज पाटील यांचे यश असल्याचे समस्त कोल्हापूर कबूल करत असतानाच, सतेज पाटील मात्र हे टिम वर्क असल्याचे जाहीरपणे सांगतात. ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ, राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि खासदारांनी पाठबळ दिल्याचे सांगतात. जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह जिल्हापरिषद सीईओ अमल मित्तल यांचेही योगदान असल्याचे सतेज पाटील यांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे.

कोल्हापुरात तब्बल ३० हजारापेक्षा अधिक परप्रांतीय कामगार रेल्वेने आपल्या गावी गेले. या कामगारांना तीन दिवस पुरेल इतका शिधा सतेज पाटील यांनी दिला. भूमीपूत्रांच्या हाताला काम मिळावे यासाठी उद्योजकांना आवाहन करत खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पालक म्हणून सतेज पाटील यांनी भूमीका बजावली. राजकीय इच्छा शक्ती असेल तर प्रशासकीय पातळीवरील यश किती उच्चकोटीचे असू शकते याचे कोल्हापूर हे उदाहरण आहे.